हाथरस च्या पीडित मनिषा ताईला तात्काळ न्याय द्या…
धरणगाव तहसिल व पोलीस स्टेशनला बहुजन क्रांती मोर्चाची निवेदनाद्वारे मागणी…
सबला उत्कर्ष प्रतिनिधी – भावेश पाटील…
धरणगाव :- दि.०१/१०/२०२० हाथरस येथील ताईवर झालेला अत्याचार व जीवे ठार मारल्या प्रकरणी समस्त बहुजन बांधवांच्या भावना दुखावल्या असून याप्रकरणात असलेल्या खरे गुन्हेगारांचा त्वरीत शोध घेवून कडक कारवाई करावी , अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चा कडून करण्यात आली आहे. या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत याबाबत निवेदन तहसिल कार्यालय व पोलीस स्टेशन धरणगाव यांना देण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , हाथरस जिल्हा अलिगढ ( उत्तरप्रदेश ) येथील अतिशय गरीब कुटुंबातील मुलगी म्हणजे मनिषा वाल्मिकी. मनिषा , तिची आई व मोठा भाऊ गवत कापण्यासाठी जंगलात गेले होते. गवताचा भारा घेऊन मोठा भाऊ निघून गेला. आई गवत कापत होती व पिडीत मनिषा गवत गोळा करत होती. मनिषाची आई तिच्या कामात व्यस्त आहे हे लक्षात घेऊन चार नराधमांनी १९ वर्षीय पीडित मनिषाला तिच्या गळ्यातील ओढणीच्या सहाय्याने बाजरीच्या शेतात ओढत नेले व तिच्या शरीराचे लचके तोडत सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर पीडित तरुणीने तिच्यावर झालेला अत्याचार कोणाला सांगू नये म्हणून तिची जीभ कापण्यात आली , पोलिसांपर्यंत जाऊ नये म्हणून तिच्या पाठीचा कणा मोडून टाकला. पीडितेवर झालेल्या अन्यायाची दखल पोलिसांनी घेतली नाही उलट ही तरुणी ढोंग करतेय असं सांगून त्यांना धुत्कारून देण्यात आलं. पीडित तरुणी १५ दिवसांपर्यंत सफदरजंग च्या हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत राहिली अखेर २९ सप्टेंबर २०२० रोजी तिची झुंज अपयशी ठरली व तिने प्राण सोडले. एवढ्यावरच हा अन्याय संपला नाही तर पीडितेचे मृत शरीर तिचे आई – वडील आणि नातेवाईक मागत असतांना देखील ते त्यांच्या ताब्यात न देता परस्पर अंत्यसंस्कार करण्यात आले , भारतातील बहुधा ही पहिलीच घटना असेल. एकीकडे ‘महिला सुरक्षा’ , ‘बेटी बचाव – बेटी पढाव’ च्या मोठमोठ्या पोकळ वल्गना करणाऱ्या भाजपचे सरकार उत्तरप्रदेश मध्ये असतांना जर अशी घटना घडत असेल , एवढ्या दिवसापर्यंत मीडियावर याची बातमी येत नसेल तर याला नेमकं जबाबदार कोण? या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ फाशी देण्यात यावी.
हाथरस येथील भगिनीवर समाजकंटकांनी बलात्कार करून तिची जीभ कापली , तिच्या पाठीचा कणा तोडला व नको तसे कृत्य केल्याप्रकरणी सर्व बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहनराव शिंदे , छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील व माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही. टी. माळी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी , अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने तहसिलदार नितिनकुमार देवरे , नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ , एपीआय गणेश अहिरे व गुंजाळ साहेब यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ , भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहनराव शिंदे , छत्रपती क्रांती सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील , बामसेफचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील , माळी समाजाचे कोषाध्यक्ष विनोद माळी , बामसेफ तालुका उपाध्यक्ष हेमंत माळी , राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब चौधरी , शहराध्यक्ष गोरखभाऊ देशमुख , भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष निलेश पवार , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे सिराज कुरेशी , भोई समाजाचे पंच जिवन भोई , शहराध्यक्ष नगर मोमीन , करीम लाला , भारत मुक्ती मोर्चाचे गौतम गजरे , विक्रम वाघमारे , आकाश बिवाल सर , आनंद पाटील , माळी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते ओंकार माळी , अमोल सोनार , मयूर भामरे , दिपक सोनवणे , अमोल देशमुख , सिद्धांत वाघरे , सागर पचेरवार , एकलव्य (नाईक) समाजाचे अध्यक्ष , बापूसाहेब मोरे , वामनराव नाईक , ह.भ.प. गोपाळ महाराज यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.