औरंगाबाद महापालिकेची निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता…?
औरंगाबाद :- ( सबला उत्कर्ष प्रतिनिधी ) :- बिहार विधानसभेचे बिगूल वाजल्यानंतर औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक डिसेंबर-2020 मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ही निवडणूक लांबणीवर पडल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये प्रतिक्षा दिसून येत आहे. मार्च महीन्यापासून कोविड-19 मुळे देशात लॉकडाऊनच्या काळात सर्वच निवडणूक लांबणीवर पडले होते. आता परिस्थिती अनलॉकमुळे पूर्वपदावर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. कोरोनाचे संकट वाढू नये यासाठी काही नियम व अटी घातले आहे. मतदान प्रसंगी प्रत्येक मतदाराला हातमोजे घालावे लागणार आहे. कोरोना काळात देशात होणारी ही पहीलीच निवडणूक आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघ, महानगरपालिका, नगरपरिषद व ग्रामपंचायत निवडणूक होण्याचा मार्ग खुला झाला आहे. राज्यातील औरंगाबाद, नागपूर, पूणे पदवीधर मतदारसंघ, अमरावती शिक्षक मतदारसंघाची मुदत संपली आहे. त्याव्यतिरिक्त अनेक महापालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे. राज्य सरकारने निवडणूका घेण्यात याव्यात यासाठी तयारी दर्शवली आहे. राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. औरंगाबाद महापालिकेच्या आरक्षण सोडत, वार्ड रचना यापूर्वीच जाहीर केल्याने निवडणूकीची तारीख जाहीर करायची आहे. यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे.