घाटीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण…
जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांची घाटी रुग्णालयास भेट.
औरंगाबाद,दि. 5 ( सबला उत्कर्ष न्यूज ):- घाटी येथे कार्यरत असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने करून घाटीच्या सुरक्षेत वाढ करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.
पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या समवेत जिल्हाधिकारी यांनी घाटी रुग्णालयाच्या परिसरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेतील पीडित निवासी महिला डॉक्टरची भेट घेऊन संवाद साधला.यावेळी घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांच्या सह इतर संबंधित उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी घाटी परिसरातील घटनास्थळाची पाहणी करून एनआरएच महिला होस्टेलला भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रशासन सर्व डॉक्टर आणि पीडित यांच्या पाठीशी असून यापुढे असे प्रकार होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल,असे सांगून जिल्हाधिकारी यांनी घाटीतील डॉक्टर, कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना तत्परतेने करण्याबाबत संबंधितांना निर्दश दिले.
मार्डच्या शिष्टमंडळाने यावेळी निवेदन देऊन घाटी मध्ये जे टवाळखोर मुलांचे प्रमाण वाढलेले आहे त्याच्यावर निर्बंध आणावे. हॉस्टेलची आणि परिसरातली भिंती आहेत त्यांची उंची वाढवावी. सोशल वर्कर असल्याचे सांगून अनेक लोक डॉक्टरवर दादागिरी करतात हे प्रकार वाढत असून त्याच्यावर नियंत्रण आणावे.तसेच घाटी परिसरात पोलिसांची पेट्रोलिंग वाढवावी,अशा मागण्या यावेळी केल्या.