पक्षाला मोठी हानी होण्याची शक्यता नाही गिरीश महाजनांनी व्यक्त केली भावना…
पक्षाला मोठी हानी होण्याची शक्यता नाही गिरीश महाजनांनी व्यक्त केली भावना.
जळगाव : सबला उत्कर्ष न्युज ( मयूर वागूळदे ) :- राजकारणात अनेक लोक येतात आणि जात असतात. हा प्रकार सर्वच राजकीय पक्षांमध्ये सुरू असतो. परंतु नाथाभाऊंनी पक्ष सोडणे वेदना देणारे आहे. त्यांनी राष्ट्रवादीत जायला नको होते. त्यांच्या जाण्याने काही काळ नक्कीच त्रास होणार असला तरी दिर्घकाळासाठी नसेल. भाजपाची कार्यपध्दतीत नवीन नेतृत्व तयार होत असते. कार्यकर्त्यांच्या विचारांवर व लोकशाही मानणारा पक्ष असल्याने फार हानी होणार नाही. ते जामनेरच्या कार्यक्रमाला आले असते तर समज- गैरसमज दूर झाले असते. भेटीतून मार्ग निघाला असता अशी प्रतिक्रीया माजी मंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन यांनी एक वृत्तपत्राशी बोलताना दिली.
माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर माजी मंत्री महाजन बोलत होते. त्यांनी खडसेंच्या पक्ष सोडण्यामुळे एक मित्र दुरावल्याचे सांगीतले. तीन दशके त्यांनी उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व केले. पक्षासाठी त्यांचे योगदान होते. त्यांनी भाजपचा राजीनामा दिल्याचे दु:ख आहे. राजकारणात अनेक लोक येतात आणि जातात. देशातील सहा मुख्यमंत्र्यांची नावे सांगता येतील. परंतु या घडामोडी क्षणीक असतात. अनेक दशके नेतृत्व केलेले अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खराब झाल्यानंतर कसे होईल असा प्रश्न उपस्थित झाला होता. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या जाण्यानंतर मोठी पोकळी निर्माण झाली. परंतु त्यानंतर त्यांच्या घरातून नवीन नेतृत्व तयार झाले. खडसेंच्या जाण्याने काहीकाळ त्रास होईल परंतु तो दिर्घकालीन नसेल. भाजपला फार हानी होणार नाही. राज्यात सर्व महापालिकांत भाजपची सत्ता आहे. जळगावात देखिल एकहाती सत्ता आहे. अशा परिस्थितीत कोणीही पक्ष सोडणार नाही, असा विश्वास महाजन यांनि केला..