वीजपुरवठा सुरळीत चालू करा अन्यथा आंदोलन- आ.कृष्णा गजबे…
!! गडचिरोली जिल्ह्यात सुरळीत विज अभावी शेतकरी हतबल !!
★ आ.कृष्णा गजबे यांची विज वितरण विभागाला निवेदन
आशिष सुनतकर
गडचिरोली जिला प्रतिनिधी ( सबला उत्कर्ष ) :-
गडचिरोली/कुरखेडा :
खरिपात झालेली नुकसानभरपाई रब्बी हंगामात होईल, या आशेवर असलेला शेतकरी वीज मंडळाच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झाला आहे. कृषिपंपांना सुरळीत वीजपुरवठा करून हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा वीज वितरण कंपनीच्या विरोधात दिनांक ७ डिसेंबर सकाळी ९ वाजता तीव्र चक्काजाम आंदोलन मौजा गेवर्धा येथे छेडण्यात येईल, असा इशारा आमदार कृष्णा गजबे यांच्या वतीने देण्यात आला.
यंदा चांगला पाऊस झाल्याने मनार प्रकल्पासह छोटे-मोठे तलाव, विहीरी तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी जोरात केली आहे. यंदा रब्बीचे पीक चांगले येईल, अशी आशा निर्माण झाली आहे. पण, वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे गहू, हरभरा व इतर पिकांना पाणी देता येईल, की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.
तालुक्यातील अनेक ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त आहेत. सुरळीत आणि योग्य दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने कृषी पंप चालत नसल्याची स्थिती आहे.
गावठाण डिपीसह कृषी पंपांचे रोहित्रं बंद आहेत. याची सूचना शेतकऱ्यांना दिली जात नाही. नादुरुस्त डि.पी. दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही. त्यातच शेतीसाठी जाणीवपूर्वक कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे रोहित्रे टिकत नाहीत. विद्यूत वाहिनीवरचा लोड व्यवस्थित राहावा, यासाठी वीज मंडळाने आठ – आठ तासाचे वेळापत्रक तयार केले आहे. तरीही सुरळीत वीजपुरवठा होत नाही.
आठ दिवसांत कुरखेडा तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वीज वितरण कंपनीच्या उप-कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदनावर मा व्यंकटीजी नागीलवार,हेमांतजी खुणे,भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये,दिगांबर पा नाकाडे, राकेश खुणे, नितीन खुणे, रोशन सय्यद, नुपराज लाडे,बबलुभाऊ शेख,मुन्नाभाऊ डहाळे, भगवान डहाळे,केशव किरसान, नारायण नाकाडे उपस्थित होते.