छत्रपती संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मराठवाड्यातील पूरपरिस्थिती आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याबाबत निवेदन देऊन जवळपास १ तास चर्चा…..

छत्रपती संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मराठवाड्यातील पूरपरिस्थिती आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याबाबत निवेदन देऊन जवळपास १ तास चर्चा…..

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचवणे बाबत..

“कष्ट करून गावोगावी फिरा. शेतकऱ्यांना गोळा करा. ज्याला बैलजोडी आणि जोत हवा असेल त्याला ते द्या. पैसे द्या. खंडी, दोन खंडी धान्य द्या. दिलेल्या मदतीचा वसूल वाडीदिडी ने करू नका. मुद्दलच जेवढी हळूहळू ऐपत आल्यानंतर घ्या. त्यासाठी तिजोरीवर दोन लाख लारी बोजा पडला तरी चालेल.” छत्रपती शिवाजी महाराज.शिवरायांचे हे वाक्य किंवा त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना दिलेला आदेश आजच्या परिस्थितीत अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे. परतीच्या पावसाने महाराष्ट्रची विशेषतः मराठवाड्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. तेथील शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सतत काहीतरी घडतं आणि मराठवाड्याचा शेतकरी संकटात सापडतो. कोरडा दुष्काळ असेल, रोगराई असेल किंवा यंदा खरिपाचा हंगाम हातात पडणार तोच अतिवृष्टी होऊन संपूर्ण शेतकी व्यवस्था कोलमडली. या ढगफुटीने शेती चे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पाझर तलावांचा कालवा फुटून शेतात दगड गोटे साठलेत. तुळजापूर तालुक्यातील, सलगरा दिवटी येथील चव्हाण नावाच्या शेतकऱ्यांची साडेचार एकर जमीन सध्या दगड गोट्यानी भरून गेली आहे. पाण्याचा प्रवाह संपूर्ण शेतातून वाहत आहे. तोच प्रकार निलंगा तालुक्यातील सोनखेड या गावात तेरणा नदीने आपली वाटच बदलली आहे. त्यामुळे कितीतरी एकर जमिनीला शेतकऱ्यांना मुकावे लागले आहे. ओढ्या लागत च्या असंख्य ठिकाणी रानातील माती वाहून गेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे, पाईप, ड्रीप, सिंचन मोटारी वाहून गेल्या आहेत. अनेक गावांत घरे वाहून गेली आहेत. ह्या प्रकारच्या झालेल्या नुकसानी करीता काहितरी उपाय योजना केली पाहिजे.शेतातील बहुतांश पिकांना फटका बसला आहे. बागायती शेती, जिरायती शेतीची पिके, कोरडवाहू जमिनीतील पिके वाहून तरी गेली आहेत. किंवा जाग्यात कुजून तरी गेली आहेत. शेतकरी बांधवांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. मी स्वतः अनेक ठिकाणी, दोन दोन किलोमीटर चालत जाऊन नुकसानी ची पाहणी केली आहे. त्यामुळे जे रस्त्यावरून दिसत आहे, त्यापेक्षा परिस्थिती अधिक गंभीर आहे. माझ्या सरकार कडे मुख्य मागण्या पुढील प्रमाणे आहेत.1) 2005 चा राज्य आपत्ती व्यवस्थापन कायद्या ची अंमलबजावणी करण्यासाठी कॅबिनेट च्या बैठकीत ठराव घेऊन ‘ओला दुष्काळ आणि गंभीर पूरपरिस्थिती’ जाहीर करणे. तसेच, केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत मदत मागण्यासाठी चा प्रस्ताव तात्काळ तयार करून तो केंद्राकडे पाठवणे. त्या कायद्यानुसार, एका आठवड्यात निरीक्षण पथक राज्यात येईल, आणि राज्याला निधी मंजुरी साठी पाठपुरावा करता येईल.2) शेतकऱ्यांना सरसकट 50000 हेक्टरी भरपाई देणे. ही जवळपास सर्वच शेतकऱ्यांची मागणी आहे. 3)पीकविमा कंपन्यांना ताकीद देऊन त्यांना शेतकरी हितासाठी काम करण्यास भाग पाडणे. कारण बऱ्याच विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहेत.4) ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत, ज्यांच्या शेतात खडक साचून पडलेत, त्यांच्या नुकसान भरपाई साठी वेगळी तरतूद करून विशेष पॅकेजची घोषणा करणे. 5) ज्या शेतकऱ्यांचा ऊस पावसामुळे आडवा पडला आहे, त्यांच्या उसाचा उठाव हा प्रथमिकतेने, सर्वात आधी करण्यासाठी साखर कारखान्यांना आदेश देणे. 6) ज्या शेतकऱ्यांची गुरे ढोरे वाहून गेली आहेत, त्यांच्या साठी नुकसान भरपाईची तरतूद केली पाहिजे. 7) जी घरे वाहून गेली आहेत, किंवा पावसामुळे पडली आहेत, त्यांना मदत करणे.8) सर्वात महत्वाचे, पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून घेणे.9) अनेक ठिकाणी अतिरिक्त पावसाने रानात चवाळ लागली आहे, तेथील उभ्या पिकांचे तर नुकसान झाले आहेत, त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांना रब्बी च्या हंगामाला सुद्धा मुकावे लागणार आहे. त्याबाबत सुद्धा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. 10) तेलंगणा राज्याने तात्काळ स्वरूपात, प्रतिहेक्टरी 10000 रुपयांची तात्काळ मदत पोचवली, त्याप्रमाणे महाराष्ट्राने सुद्धा तशीच अंमलबजावणी करावी अशी सर्वच शेतकऱ्यांची मागणी आहे.वरील मागण्या ह्या प्रथमदर्शनी माझ्या निदर्शनास आल्या आहेत. त्यापेक्षा अजूनही मागण्या आहेत, परंतू पत्र विस्तार भयाने इथे देणे शक्य नाही. आपण स्वतः सुद्धा दौरा करून आला आहात, त्यामुळे आपल्याला ही विषय माहिती आहेच. आता लोकांची हीच अपेक्षा आहे, की शासनाने त्यांना तात्काळ मदत पोचवली पाहिजे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *