लॉकडाऊन टाळायचा असेल तर काही बंधने पाळावीच लागतील;जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे जिल्हावासियांना आवाहन…

लॉकडाऊन टाळायचा असेल तर काही बंधने पाळावीच लागतील;जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे जिल्हावासियांना आवाहन.

जळगाव, सबला उत्कर्ष दि. 16 – जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता नागरीकांना काही बंधने पाळावीच लागतील, अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. असे इशारा वजा आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज केले.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली विविध यंत्रणांची तातडीची बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिलहा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप जिल्हाधिकारी तुकारात हुलवळे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ रावलाणी यांचेसह टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.

राज्यातील अकोला, नाशिक, अमरावती, नागपूर, जळगावसह काही जिल्हयात कोरोनाचे पुन्हा रुग्ण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक यांचेशी व्हीडीओ कॉनफरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी जिल्ह्यातील प्रमुख यंत्रणांची बैठक घेऊन जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करुन तातडीने काही बंधने लावण्याचे निर्देश सर्व संबंधित यंत्रणेला दिले.

मास्क नाही तर प्रवेश नाही

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यापुढे शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, हॉटेल, रेस्टॉरंट, लॉन्स, मंगल कार्यालये, मॉल्स, उद्याने, क्रीडांगणे, सार्वजनिक प्रवाशी वाहतुक करणाऱ्या यंत्रणा या गर्दीच्या याठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिलेत. जे नागरीक मास्क वापरणार नाहीत, त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी पोलीस विभागास दिले.

गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन

नागरीकांनी गर्दीचे कार्यक्रम टाळावेत, महापालिका, नगरपालिका, पोलीस विभागाने गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी देतांना 100 व्यक्तींची मर्यादा ठरवून द्यावी, अन्यथा अशा कार्यक्रमांना परवानगी देण्यात येवू नये. परवानगी दिलेल्या कार्यक्रमांमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन होत असल्याची खात्री संबंधित यंत्रणांनी करावी. विना मास्क तसेच सामाजिक अंतराचे पालन होत नसल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई करण्याचेही निर्देश त्यांनी दिलेत.

सार्वजनिक आस्थापनांनी कोरोनांच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक

बाजारातील वाढती गर्दी लक्षात घेता सार्वजनिक आस्थापनांनी ग्राहकांना मास्क वापरण्याची सक्ती करावी, तसेच दुकानात सॅनिटायझरची व्यवस्था करावी, सामाजिक अंतर राखले जाईल याची दक्षता घ्यावी. मॉलस्, हॉटेल, उद्याने व सार्वजनिक समारंभामध्ये मास्क असल्याशिवाय परवानगी देण्यात येवू नये. असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

नागरीकांनी कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन जिल्ह्यात कोरोना पुन्हा प्राद्रुर्भाव होणार नाही यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. तसेच पुढील सात दिवसात रुग्ण संख्येत सतत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास जिल्ह्यात लॉकडाऊनसारखा पर्याय अवलंबवा लागेल, असा इशाराही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी दिला आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *